उत्तर प्रदेश : सहारनपूर जिल्ह्यात क्रशर सुरू, बाजारपेठेत नव्या गुळाची आवक

सहारनपूर : जिल्ह्यात ऊस गाळप सुरू झाल्याने बाजारपेठा गुळाच्या आवकेने भरून गेल्या आहेत. स्थानिक बाजारपेठेत नवीन गुळाची आवक वाढू लागली आहे. सहारनपूरच्या नवीन गुळाला पंजाब आणि राजस्थानच्या बाजारपेठेतही मोठी मागणी आहे. तज्ज्ञांच्या मते, बाजारात गुळ ४२०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. साखर कारखान्यांकडील थकीत बिलांमुळे आर्थिक संकटातून जात असलेल्या शेतकऱ्यांना २७०-२७५ रुपये प्रति क्विंटल या कवडीमोल किमतीत ऊस विकावा लागत आहे. छोट्या शेतकऱ्यांना गहू आणि मोहरीसारख्या रब्बी पिकांच्या पेरणीसाठी त्यांची शेते मोकळी करावी लागत आहेत.

हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, यावर्षी गुळाची मागणी मागील हंगामापेक्षा जास्त आहे असे क्रशर चालकांचे म्हणणे आहे. हिवाळा सुरू होताच गुळाचा वापर आणखी वाढतो. त्यामुळे व्यापारी पंजाब आणि राजस्थानच्या बाजारपेठेत माल पाठवत आहेत. यावेळी गुळाच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी आणि क्रशर मालक दोघांचाही उत्साह वाढला आहे. तथापि, या ऊस हंगामात शेतकऱ्यांसमोरील अडचणी कायम आहेत. साखर कारखान्यांनी थकवलेली ऊस बिले हा शेतकऱ्यांच्या समृद्धीत एक मोठा अडथळा आहे. जिल्ह्यातील दोन प्रमुख साखर कारखान्यांकडे अजूनही सुमारे १२५ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. अनेक महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना ऊस कवडीमोल भावात विकावा लागतो. अशा परिस्थितीत, क्रशरला ऊस विकण्याचा पर्याय त्यांना तात्काळ रोख रक्कम प्रदान करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here