लखनौ : उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत गेल्या चार दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आता मान्सून कमजोर झाल्याने पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. लखनौ हवामानशास्त्र विभागाने सोमवारसाठी फक्त मिर्झापूर, सोनभद्र, चंदौली, संत रविदास नगर, वाराणसी, गाजीपूर, आजमगढ, मऊ, बरेली, पिलीभीत, शाहजहांपूर, संभल, बदायूं आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पूर्व विभागात मात्र काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस कोसळू शकतो. या आठवडाभर अशीच स्थिती राहील, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. यापूर्वी रविवारीही राज्याच्या अनेक भागात पाऊस कोसळला. गेल्या काही दिवसांपासून सुरू राहिलेल्या संततधार पावसाने लोकांना अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी पाणी साठले होते. पावसाशी संबंधित घटनांमध्ये २०हून अधिक जणांचा मृत्यू झाला. आठवडाभर बहुतांश शहरांमध्ये हवेची गुणवत्ता समाधानकारक ते मध्यम श्रेणीत राहिल.












