पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (व्हीएसआय) प्रतिटन देण्यात येणाऱ्या एक रुपयातील २५ पैशांचा निधी हा पाडेगाव ऊस संशोधन केंद्रास संशोधनासाठी द्यावा, अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फलटण येथील पाडेगाव केंद्रातही कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून उसाच्या नवीन प्रजाती, वाण विकसित करून शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीतही योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.
मांजरी येथील ‘व्हीएसआय’च्या एआय तंत्रज्ञानाच्या चर्चासत्रात बोलताना कोकाटे यांनी सोमवारी (दि.९) ही मागणी केली. विशेषज्ञ डॉ. सुरेश पवार यांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे लक्ष वेधले. राज्यात ऊस वाण पुरवठ्यात ८० टक्के वाटा पाडेगावचा आहे. मात्र, त्यासाठी आर्थिक तरतूद करून तेथील तंत्रज्ञान सर्वदूर पोहोचविण्याची मागणी केली. राज्यात यंदा पीक विम्यासाठी कंपन्यांकडून आलेल्या निविदेची राज्य सरकारच्या विमा हप्त्याची रक्कम ७३३ कोटींची आहे. निविदेमध्ये गतवर्षीच्या १३.५५ टक्के विमा हप्त्याच्या तुलनेत चालूवर्षी केवळ ४.०४ टक्के विमा हप्ता दर आला आहे. गतवर्षी राज्य सरकारचा हिस्सा ५ हजार ५९१ कोटी होता. तो आता ७३३ कोटी रुपयांवर आल्याने राज्य सरकारची ४ हजार ८५७ कोटी रुपयांची बचत होणार आहे. तर केंद्र सरकारची सुमारे ३ हजार ४२१ कोटींची बचत होणार आहे. त्यामुळे विम्यापोटी राज्य सरकारचे वाचणारे बचतीचे पैसे हे शेतीमधील भांडवली गुंतवणुकीसाठी कृषी विभागाला देण्याची मागणी कोकाटे यांनी या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.