सांगली : गुजरात राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी यंदाही शेतकऱ्यांसाठी चांगले ऊसदर जाहीर केले आहेत. गणदेवी येथील श्री सहकारी कारखान्याने प्रतिटन तीन हजार ८५१ रुपये भाव दिला आहे. हा दर तोडणी, वाहतूक खर्च वजा करून आहे. मग सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कारखान्यांकडून दर कमी का दिला जातो असा सवाल शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत कोले यांनी सांगितले की, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा साखर उतारा अधिक आहे. येथील कारखान्यांमध्ये गुजरातपेक्षा १२ ते १५ किलोने जास्त साखर उत्पादन मिळते. मग दर कमी का दिला जातो? गुजरातने यंदा हंगामाचा सर्वोच्च दर दिला आहे. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखाने आजपर्यंत असे करू शकले नाहीत. दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा साखर उतारा गुजरातपेक्षा १२ ते १५ किलोने जास्त आहे. त्याचे वाढीव ४०० रुपये शेतकऱ्यांना मिळू शकतात. मात्र, गुजरात इतकाही दर दिला जात नाही. त्यामुळे ऊसदरात प्रतिटन एकूण आठशे ते हजार रुपये तोटा शेतकऱ्यांना होत आहे.