साखर एमएसपी वाढीसाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : उसाच्या एफआरपी दरात सातवेळा वाढ झालेली आहे. परंतु, साखरेची एमएसपी एकदाच वाढलेली आहे. ती वाढावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचीही भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली. पवार म्हणाले की, एफआरपीत वाढ होत असताना एमएसपी देखील वाढली पाहिजे; म्हणजे एमएसपीच्या आत कारखान्यांना साखर विकता येणार नाही. त्यासाठी केंद्राकडे आवश्यक तो पाठपुरावा सुरू आहे. साखर आयुक्तांच्या आकडेवारीनुसार राज्यातील ९२ कारखान्यांकडून ८६४ कोटी रुपये एफआरपीपोटी शेतकऱ्यांना येणे आहे. त्यामुळे २० कारखान्यांवर आरआरसी कारवाई करीत साखर ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पवार यांनी दिली.

एकीकडे तोडणी वाहतूक खर्च आता २०० रुपये टनांपर्यंत गेला आहे. इतर खर्च वाढले आहेत. ऊस उत्पादकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. साखरेच्या दराच्या ८५ ते ९० टक्के रक्कम बँकांकडून कर्जाऊ दिली जाते. त्यातून ऊस बिल भागवावे लागते. तोडणी वाहतूक खर्च द्यावा लागतो. शेतकऱ्यांना ॲडव्हान्स द्यावा लागतो. त्यामुळे एमएसपी वाढ गरजेची आहे, असेही पवार यांनी सांगितले.

यंदाच्या हंगामात साखर उद्योगासाठी प्रतिकूल राहिला आहे. गाळप कमी झाले, साखर उत्पादन घटले आहे. क्षेत्र तेवढेच राहणार आहे. आता उत्पादनवाढ करावी लागेल. त्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. माळेगाव, सोमेश्वर, छत्रपतीसह राज्यातील सहकारी, खासगी कारखान्यांनी त्यात पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. यासंबंधी ९ जूनला वसंतदादा शुगर इन्टिट्यूटमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला माझ्यासह कृषिमंत्री, सहकारमंत्री, कारखान्यांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादनात वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा अवलंब करावाच लागेल, असे पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here