बुलंदशहरमध्ये वाढले ११ हजार ऊस उत्पादक शेतकरी

बुलंदशहर : जिल्ह्यात यंदा ऊसाचे क्षेत्र वाढण्यासह उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी १.१८ लाख ऊस उत्पादक शेतकरी होते. यंदा ही संख्या १.२९ लाख झाली आहे. शासनाने ऊस उत्पादकांना नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत वाढीव मुदत दिली आहे.

जिल्ह्यात यावेळी ७३,५७४ हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. गेल्यावर्षी हेच क्षेत्र ६४,५८० हेक्टर होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ८ हजार ९९४ हेक्टर ऊस क्षेत्र वाढले आहे. यावर्षी ऊस क्षेत्र वाढण्यासह उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही वाढली असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी डी. के. सैनी यांनी सांगितले. २० ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार कारखान्यांतील कामे आधीच सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, चार कारखान्यांनी ९३ कोटी रुपयांहून अधिक ऊस बिले थकवली आहेत. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये अनुपशहर साखर कारखान्याकडे २३.६६ कोटी, वेव शुगर मिलकडे ३१.५४ कोटी, हापुडच्या ब्रजनाथपूर कारखान्यावर २२ कोटी रुपये आणि सिंभावली साखर कारखान्याकडे १६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

दरम्यान, साखर कारखाने सुरू करण्याची तयारी झाली आहे. मात्रस कारखान्यांकडे कोट्यवधी रुपयांची ऊस थकबाकी आहे. कारखान्यांनी हंगामापूर्वी थकीत ऊस बिले द्यावीत अशी अपेक्षा शासनाची आहे असे अनुज कुमार यांनी सांगितले. तर चौदा दिवसांत ऊस बिले दिली पाहिजेत असा नियम आहे. मात्र, कारखाने याचे पालन करीत नाहीत. वेळेवर पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे पवन तेवतिया म्हणाले. सरकारने ऊस दरात २५ रुपयांची वाढ केली. मात्र, वेळेवर ऊसाचे पैसे कारखान्यांनी देणे हेही महत्त्वाचे आहे असे मुरालीलाल शर्मा यांनी सांगितले. जिल्हा कृषी अधिकारी राहुल तेवतीया यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील शेतकरी गहू, भात या पिकांबरोबरच ऊस शेती करत आहेत. गेल्या वर्षी भाताला कमी दर मिळाल्याने ते उसाकडे वळले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here