बरेली : लखीमपुर खेरी जिल्ह्यातील ईसानगर परिसरातील साखर कारखान्यात रविवारी सायंकाळी उसाच्या रसाची टाकी साफ करत असताना एका 22 वर्षीय व्यक्तीचा गुदमरुन मृत्यू झाला. तर तीन जण बेशुद्ध पडले. मोहम्मद फैय्याज (वय 22) असे मृताचे नाव असून तो बुडौन येथे राहतो.
कारखाना अधिकारी उस गाळप संपवून टाकीची साफसफाई करुन शटर खाली करण्याच्या तयारीत होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फैय्याज, सुहेर, फारुख आणि तफसिल हे चार कामगार टाकी स्वच्छ करण्यासाठी टाकीच्या आत गेले. परंतु विषारी वायुमुळे ते बेशुद्ध पडले.
त्यांना इतर मजुरांनी टाकीतून बाहेर काढले. तातडीने जवळचया रुग्णायलात नेले. पण रुग्णालयात पोचण्यापूर्वी फैय्याजचा मृत्यू झाला. गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. टाकीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मजुरांना कोणतेही सुरक्षा उपकरण दिले गेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
धौरहरा उपविभागीय दंडाधिकारी सुनंदू सुधाकरन यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत कारखाना व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे व्यवस्थापन दोषी आढळले. जिल्हाधिकारी शैलेंद्र सिंह यांच्याकडे हा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी सुधाकरन म्हणाले, हा मृत्यू सल्फर डाय ऑक्साईड वायूच्या गळतीमुळे झाला असून, याकडे कारखाना प्रशासनाचे स्पष्ट दुर्लक्ष झाले आहे. कारखाना प्रशासनाविरुद्ध मी एफआयआर ची शिफारस केली आहे. पण अद्यापपर्यंत कुटुंबाने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.
दरम्यान, कारखाना व्यवस्थापक संजय सिंह म्हणाले, गॅस गळतीमुळे पीडिताचा मृत्यू झाला नसून, त्याचा पाय चुकून टाकीमध्ये घसरल्याने झाला आहे.