छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.बाबासाहेब निवृत्ती डोळे यांना ऊसाच्या चिपाडापासून (बगॅस) पेनाची शाई बनविण्याच्या रसायनासाठी पेटंट जाहीर झाले आहे. एखाद्या प्रॉडक्टला मिळालेले हे पहिलेच पेटंट असून या इको फ्रेंडली शाईचा व्यावसायिक पद्धतीने वितरण करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.पदार्थविज्ञान विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ.बी.एन. डोळे व तनया डोळे यांना यांना पेटंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या पेटंट नियंत्रक उन्नत पंडित यांनी घोषित केले आहे. ’ए प्रोसेस टू सिंथीसाईज वॉटर बेस्ड जॉटींग-इंक फ्रॉम नॅचरल वेस्ट थु मायक्रोवेव्ह असिस्टेड’ – सॉलीड स्टेट रिएक्शन टेक्निक्स ’ अर्थात ऊसाच्या चिपाडातून (बॅगस) पेनाची शाई बनविण्यासाठी सदर पेटंट घोषित करण्यात आले आहे.
कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.डोळे यांनी 6 एप्रिल 2024 रोजी पेटंट नोंदणीसाठी आवेदन सादर केले होते. डोळे हे गेल्या वीस वर्षांपासून पदार्थविज्ञान विभागात कार्यरत आहेत. तत्पूर्वी जेईएस महाविद्यालय, जालना व पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय त्यांनी अध्यापन कार्य केले आहे. तसेच पदार्थविज्ञान विभागप्रमुख, अभ्यासमंडळ अध्यक्ष, विद्या परिषद सदस्य, खरेदी समिती, रिड्रेसल कमिटी आदी पदांवर त्यांनी काम केले आहे. तसेच ’बामुटा’ संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. तसेच २ मे पासून ते परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
इको फ्रेंडली व देशी बनावटीची शाई…
वेस्टपासून बेस्ट या अंतर्गत उसाच्या चिपडापासून शाई बनविण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. या शाईचे वैशिष्ट्य म्हणजे ही केमिकल मुक्त व इको फ्रेंडली अशी शाई असणार आहे. तसेच ही कागदावर लिहिल्यानंतर जास्त पसरणार नसून तिचे आयुष्यही जास्त दिवस असणार आहे. देशी बनावटीच्या या शाईचा वापर इंक पेन, बॉल पेन, पॅड व मुद्रणासाठी देखील आगामी काळात करता येणार आहे. तसेच उसाच्या चिपडापासून ही शाई तयारवकरण्यात येत असल्यामुळे अधिक स्वस्तही उपलब्ध करून देण्यात येईल. विद्यापीठाला पहिल्यांदाच प्रॉडक्ट बेस्ड पेटंट मिळाल्याचा आनंद असून मा. कुलगुरू डॉ विजय फुलारी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन यामुळे हे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया डॉ.बाबासाहेब डोळे यांनी व्यक्त केली.
बगॅसपासून पेनाची शाई…
बगॅस म्हणजे उसाच्या रस काढल्यानंतर उरलेले फायबर्स (राखराखीत भाग), जे ऊस कारखान्यात ऊस गाळल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तयार होते. पारंपरिकरित्या बगॅसचा उपयोग इंधन, कागद बनवणे किंवा खत म्हणून होतो. पण अलीकडच्या काळात चिपाड बगॅसपासून विविध इको-फ्रेंडली उत्पादने तयार केली जात आहेत, त्यात पेनाची शाई (Ink) हा एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक प्रयोग आहे.
बगॅसपासून शाई कशी तयार होते?
1. बगॅस प्रक्रिया : बगॅसला प्रथम सुकवले जाते आणि त्याचे बारिक तुकडे केले जातात.
2. सेल्युलोज वेगळी करणे : बगॅसमध्ये असणारा सेल्युलोज हा शाई तयार करण्यासाठी उपयुक्त घटक असतो. विशेष रासायनिक प्रक्रियेतून त्याला वेगळं केलं जातं.
3. कार्बनायझेशन : बगॅसपासून कार्बनयुक्त पदार्थ तयार केला जातो. यालाच पुढे ब्लॅक इंक किंवा डार्क इंक बनवण्यासाठी वापरले जाते.
4. बाइंडर व रंगद्रव्यांची मिसळ : नैसर्गिक बाइंडर (जसे की गोंद) आणि रंगद्रव्ये (पिग्मेंट) मिसळून योग्य प्रमाणात viscosity (द्रवतेचा गुणधर्म) साधला जातो.
5. फिल्ट्रेशन आणि पॅकिंग : तयार शाई चाळून फिल्टर केली जाते आणि नंतर ती रेफिलमध्ये किंवा बाटल्यांमध्ये भरली जाते.