कोल्हापूर : आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे उसाची उंची वाढत नाही. यंदाही पर्जन्यमान वाढल्याने उसाची वाढ खुंटली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता सध्या अनेक साखर कारखानदारांनी ऊस तोडणीसाठी यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे वसंतराव देसाई आजरा कारखान्यानेही यावर्षीपासून चार ऊस तोडणी यंत्रे (हार्वेस्टर) कार्यरत केली आहेत. आमचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून, पुढील वर्षापासून यंत्रांची संख्या वाढविली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.
याबाबत अध्यक्ष देसाई यांनी सांगितले की, ऊसतोडणीसाठी येणाऱ्या विविध अडचणींवर मात करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. सध्या कारखान्यांना ऊसतोडणीसाठी टोळ्या मिळविणे आव्हानात्मक बनले आहे. ऊस टोळ्यांची कमतरता आहे. गेल्या दहा वर्षांपासून कारखान्यांकडून ऊस तोडणी टोळ्यांसाठी ॲडव्हान्स दिला जातो. त्याची जबाबदारी वाहन मालकांवर असते. अनेकदा ऊस तोडणी टोळ्यांकडून वाहनधारकांची फसवणूक केली जाते. यामुळे राज्यातील इतर साखर कारखान्यांप्रमाणे आजरा कारखान्यानेही यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरू केली आहे. कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी विक्रमसिंह देसाई यांनी सांगितले की, कारखान्याने यांत्रिकीकरणाकडे वळणे ही काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांनी यासाठी माहिती घ्यावी. ऊस लागवड करताना चारफुटी सरी सोडून उसाची लागण करावी. त्यातून मशीनद्वारे ऊस तोडणीला गती मिळेल.

















