मुंबई: महाराष्ट्रात इथेनॉल उत्पादनाने गती घेतली आहे. साखर कारखान्यांकडून सरकारच्या २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यांमध्येही इथेनॉल उत्पादनासाठी साखर कारखान्यांकडू चांगली कामगिरी केली जात आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्स असोसिएशनने (एनएफसीएसएफ) सांगितले की, महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यां सोबत स्वतंत्र डिस्टिलरी युनिटनी यावर्षी ऑक्टोबरअखेर ५९.६१ कोटी लिटरच्या उद्दीष्टांच्या तुलनेत आतापर्यंत उच्चांकी ६५.०६ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन आणि पुरवठा केला आहे.
एनएपसीएसएफचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, इथेनॉलचे आधार मूल्य कायम ठेवून देशात इंधनाच्या किमतीबरोबर इथेनॉलच्या खरेदी दरातही वाढ करण्याची गरज आहे. राज्यात इथेनॉल उत्पादनाचे उद्दीष्ठ गाठण्यात यश आले आहे. आतापर्यंत ६५.०६ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. राज्यात इथेनॉल उत्पादनाचे उद्दीष्ट ३० टक्क्यांनी वाढू शकते. देशात ऊसापासून इथेनॉल निर्मिती केली जात आहे. जे कारखाने आर्थिक तणावात आहेत, अशांसाठी हा उपाय काही प्रमाणात दिलासा देणारा ठरेल. जे कारखाने तोट्यात आहेत, त्यांना इथेनॉल उत्पादनातून मदत मिळेल.
अलिकडेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (ईस्मा) सांगितले होते की, भारत २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट गाठण्याच्या मार्गावर आहे. एका बैठकीत बोलताना इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, देशात सध्या ८.२ टक्के इथेनॉलवरुन २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल उत्पादन करण्यात काही अडचण येणार नाही.