पुणे : जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी खरिपात शेतकऱ्यांनी ३२ हजार ३८३ हेक्टरवर चारा पिकांची पेरणी केली होती. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे चारा पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. त्यामुळे चाराटंचाई भेडसावण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गळीत हंगामात सहकारी, खासगी साखर कारखाने सुरू झाले आहे. ऊस तोडीमुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी लागणारा.
हिरवा म्हणून वाडे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चाराटंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक ऊसतोड मजूर ऊस तोडून कारखान्यांना देतात. त्यातून चांगले पैसे मिळत असले तरी उसाचे वाडे ते शेतकऱ्यांना, दुग्धव्यवसाय करणाऱ्यांना विकतात. सध्या प्रती शेकडा २०० ते ३०० रुपये एवढा दराने ऊसतोड मजूर वाड्याची विक्री करत आहेत. रब्बीत शेतकऱ्यांनी १७ हजार ५९ हेक्टरवर चारा पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांचा समावेश आहे. लागवडीनंतर दोन ते तीन महिन्यांनंतर चायांचे उत्पादन होते. त्यामुळे चाराटंचाई कमी होण्यास मदत झाली असली तरी रब्बीत पेरणी केलेल्या चारा पिकांच्या लागवडीतूनही मोठे उत्पादन होणार आहे. पुणे जिल्ह्यातही हवेली, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, पुरंदर तालुक्यांत बोटावर मोजण्याएवढ्या क्षेत्रावर लागवड झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.