कोल्हापूर: वेळेत ऊसतोडण्या न दिल्याच्या कारणावरून आधीच पुरामुळे हवालदिल झालेल्या पाडळी खुर्द येथील संतप्त शेतकऱ्यांनी दोनवडे येथील कुंभी कासारी कारखान्याच्या गट कार्यालयाला कुलूप लावून कर्मचाऱ्यांना कोंडले. पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कारखाना तारेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाल्याने शेतकऱ्यांनी संतप्त होत हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
पाळीपत्रकाप्रमाणे तोडणी येऊनही चिटबॉयकडून राजकीय द्वेषभावनेने तोडण्या दिल्या जात नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कारखान्याने ऊसतोडणीचे पाळीपत्रक विस्कळीत केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर तोडावा अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार करूनही त्यावर कोणत्याही हालचाली होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर हे पाऊल उचलले , कार्यकारी संचालक आणि शेती अधिकाऱ्यानी ऊसतोडणीसाठी ज्यादा यंत्रणा पुरवण्याचे आश्वासन दिल्यानंतर या कर्मचाऱ्यांना मोकळे करण्यात आले.