गत हंगामातील उसाच्या दुसऱ्या हप्त्याला आठवडाभरात मंजुरी : पालकमंत्री मुश्रीफ यांचे आश्वासन

कोल्हापूर : गत हंगामातील ५० व १०० रुपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कागल येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची निवासस्थानी भेट घेतली. गेल्यावर्षीच्या ऊस आंदोलनावेळी मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने ऊस आंदोलनात तोडगा काढला होता. त्याविषयी विचारणा करण्यात आली. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ज्या कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर केले आहेत, त्यांची या आठवड्यात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून तातडीने दुसरा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यास प्रयत्न करू, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्याचे मुख्य सचिव व ऊस दर नियंत्रण समितीचे अध्यक्ष नितीन करीर यांना दुरध्वनीवरून संपर्क करून या आठवड्यात ऊस दर नियंत्रण समितीची बैठक लावण्याची विनंती केली. तातडीने उर्वरित कारखान्यांचे प्रस्ताव मागवून कार्यवाही करण्याचे आदेश साखर आयुक्त अनिल कवडे यांना दिले. जवळपास अडीच महिने उलटूनही या विषयावर कार्यवाही झाली नसल्याबद्दल स्वाभिमानीने विचारणा केली. जिल्ह्यातील फक्त ८ साखर कारखान्यांनी असे प्रस्ताव सादर केले असल्याबद्दल सांगण्यात येते. प्रदेश सरचिटणीस राजेंद्र गड्यान्नावर, विठ्ठल मोरे, सागर शंभुशेटे, मिलींद साखरपे, अजित पोवार, धनाजी पाटील, कागल तालुका अध्यक्ष डॅा. बाळासाहेब पाटील, अविनाश मगदूम, सागर कोंडेकर, प्रभू भोजे, तानाजी मगदूम, शैलेश आडके, संजय चौगुले, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here