कोव्हीड-१९ चे संकट सुरु झाले त्यावेळी राज्यात केवळ 2 प्रयोगशाळा होत्या आता ही संख्या ८५ झाली आहे: मुख्यमंत्री

रत्नागिरी: रत्नागिरी विषाणू प्रयोगशाळेच्या निमित्ताने आरोग्य विषयक मुलभूत सुविधेत वाढ झाली आहे. या पुढे आता कोरोना विषयक चाचण्यांची गती वाढेल. याचा जिल्हयातील सर्वांना फायदा होणार आहे. आता येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आहे तर त्याचा प्रस्ताव करा ते देखील करु, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रयोग शाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी सांगितले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 कोटी 7 लाख रुपये खर्चाने विषाणू प्रयोग शाळा उभारण्यात आली आहे,याचे उद्घाटन आज झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्घाटन केले. ठाकरे कुटुंब आणि कोकण यांचे विशेष नाते सर्वांना माहिती आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अग्रणी होते आणि मी आज मुख्यमंत्री आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रासाठी मी काम करीत आहे, असे ते म्हणाले.

तळकोकणात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्हयांमध्ये अशा स्वरुपाची प्रयोगशाळा उभारण्यास विशेष मंजूरी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आणि त्यानंतर अवघ्या 14 दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन ही अद्ययावत अशी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याच्या यंत्रे व उपकरणे यासाठी 80 लाखांहून अधिक खर्च झाला असून बांधकामासाठी 15 लाखांचा खर्च झाला. अतिशय गतिमान पध्दतीने सुविधा निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाचे यावेळी अभिनंदन केले.

लॉकडाऊन सुरु झाला त्याचा उपयोग आरोग्य सुविधांची वाढ करण्यासाठी करावा हे धोरण ठेवून राज्यात काम सुरु आहे असे सांगून ते म्हणाले की कोव्हीड-१९ चे संकट सुरु झाले त्यावेळी राज्यात केवळ 2 प्रयोगशाळा होत्या आता ही संख्या ८५ झाली आहे.संकटाचे रुपांतर संधीत केल्याने या सुविधा निर्माण झाल्या आहेत.

नगारिकांना तपासणीसाठी फार दूर जावे लागणार नाही यासाठी सुविधा निर्माण करताना त्या तपासणीचे दर देखील त्यांच्या आवाक्यात आणणे हे यापुढील काम सरकारचे असेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

या ठिकाणी प्रयोगशाळा उपलब्ध झाल्याने कोव्हीड नंतर विषाणूने होणाऱ्या एच.आय.व्ही, जनेटिक ओळख आदि सोबत कर्करोगाच्या चाचण्या देखील शक्य होणार आहेत. यासाठी ही सुविधा सर्वांना उपलब्ध राहील असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. जालना आणि रत्नागिरीला एकाच दिवशी मंजूरी प्राप्त झाली आणि रत्नागिरीची प्रयोगशाळा विक्रमी वेळेत सुरु झाली याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधानसचिव प्रदीप व्यास मुंबईतून तर सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, शेखर निकम आणि प्रसाद लाड हे रत्नागिरीतून व आमदार भास्कर जाधव चिपळूणमधून या कार्यक्रमात सहभागी झाले.

आरंभी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या प्रयोगशाळेच्या उभारणीबाबत माहिती दिली. या प्रसंगी रिमेाटने उद्घाटन झाल्यावर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे प्रयोगशाळेच्या कामकाजाबाबत तयार करण्यात आलेला एक वृत्तपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे फेसबुक वर थेट प्रसारणही करण्यात आले.

कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी आदिंची या कार्यक्रमास उपस्थिती होती. कान्हुराज बगाटे यांनी आभार प्रदर्शन केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here