लखनौ : तराई विभागातील ऊस शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बहराईच येथील जिल्हाधिकारी डॉ. दिनेश चंद्र यांनी होळीच्या कार्यक्रमावेळी ऊसाच्या रसाचा वापर केला. शुक्रवारी आपल्या सरकारी निवासस्थानी होळीच्या समारंभात जिल्हाधिकाऱ्यांनी उसाचा रस देऊन पाहुण्यांचे स्वागत केल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले. पारंपरिक वस्तूंचा वापर करून उसाचा रस काढणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दिनेश चंद्र म्हणालेकी, बहराइच हा कृषी प्रधान जिल्हा आहे. राज्यातील ऊस हे मुख्य पिकांपैकी एक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी उसाच्या रसाचे औषधी गुण, इतर फायद्यांबाबत जनजागृतीची गरज आहे.
ते म्हणाले, लिंबू, आले, पुदीना यासोबत उसाच्या रसामुळे थंडावा मिळतो. इतर कोणत्याही पॅक्ड शितपेयांच्या तुलनेत अधिक ऊर्जा मिळते. यावेळी मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. सतीश श्रीवास्तव म्हणाले की, आल्ले, लिंबू यामुळे व्हीटॅमिन वाढते. पुदिना मुळे पचन चांगले होते. विभागीय वन अधिकारी आकाशदीप बधावन यांनीही शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.