पुणे : जिल्ह्यात बारामती ॲग्रो या खासगी कारखान्याने २ फेब्रुवारीपर्यंत सर्वाधिक म्हणजे १४ लाख ४५ हजार ३९४ टनाइतके ऊस गाळप केले आहे. या कारखान्याने ८.६ टक्के सरासरी उताऱ्यानुसार १२ लाख ४५ हजार ३६० क्विटल साखर उत्पादन घेतले आहे. त्याखालोखाल श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याने ८ लाख २६ हजार ६४२ टन उसाचे गाळप केले असून सर्वाधिक ११.४० टक्के उतारा मिळवत कारखान्याने ९ लाख ४३ हजार ८५० क्विटल साखर उत्पादित केली आहे. जिल्ह्यात यंदा १५१ लाख टन ऊस गाळप अपेक्षित असून सद्यःस्थितीत ७६ लाख ३ हजार ५८० टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.
पुणे जिल्ह्यात अद्यापही ७५ लाख टन उसाचे गाळप बाकी आहे. जिल्ह्यातील ९ सहकारी आणि एकूण १४ साखर कारखान्यांकडून जोमाने ऊस गाळप सुरू आहे. जिल्ह्यात सरासरी ९.८३ टक्के उताऱ्यानुसार ७४ लाख ७३ हजार २६५ क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. जिल्ह्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमता १ लाख १४ हजार ५०० टन आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत हंगाम सुरू राहण्याची अपेक्षा असल्याचे साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.