बारामती ॲग्रोचा विक्रम, आतापर्यंत तब्बल २१ लाख टन ऊसाचे गाळप

पुणे : राज्यात सर्वांत जास्त उसाचे गाळप करण्याचा मान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथील बारामती ॲग्रो प्रा. लि. या कारखान्याने मिळवला आहे. या कारखान्याने १८ मार्चअखेर तब्बल २१ लाख ३५ हजार ७२१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर १९ लाख ५७ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वांत जास्त साखर उत्पादनात खासगी साखर कारखाने पुढे असून सहकारी साखर कारखाने उस गाळपात मागे राहिले आहेत. सद्यस्थितीत राज्यातील उसाचा गाळप हंगाम संपत आला असून येणाऱ्या एका आठवड्यात ते दोन आठवड्यामध्ये हंगाम संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. या साखर कारखान्याने १८ लाख ६० हजार २०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १६ लाख ३४ हजार ४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दौंड शुगर प्रा. लि. या साखर कारखान्याने १७ लाख २६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे तर १६ लाख ३८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सद्यस्थितीत राज्यात १ हजार १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून १ हजार २८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सर्वांत जास्त उसाचे गाळप हे कोल्हापूर विभागात झाले असून तिथे २३२ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. तर पुणे विभागात २२३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे. एकूण २११ साखर कारखान्यांनी उसाचे गाळप केले असून ७३ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. १३८ साखर कारखाने चालू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here