नवी दिल्ली: मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होण्यापूर्वी आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्यासह १२ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मंत्रिमंडळात आज फेरबदल केले जाणार आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्री हर्षवर्धन, आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे, शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंख, बाबूल सुप्रियो, रावसाहेब दानवे, प्रताप सारंगी, कामगार मंत्री संतोष गंगवार, थावरचंद गहलोत, सदानंद गौडा, संजय धोत्रे, देबाश्री चौधरी आणि रतनलाल कटारीया यांचा राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये समावेश आहे.
मंत्रिमंडळातील फेरबदलांपूर्वी कामगिरीच्या आधारावर काही मंत्र्यांना सुट्टी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कोरोना काळात मोदी सरकारवर सर्वाधिक प्रश्न उपस्थित झाले. आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याबाबत चर्चा सुरू होती.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने आरोग्य विभागावर प्रश्न उपस्थित झाले, ऑक्सिजनचा तुटवडा, बेड आणि व्हॅक्सिनची कमतरता यास रुग्णांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचा राजीनामा घेतला जाईल अशी शक्यता होती.
आता जुने आणि नवे असे ४३ मंत्री शपथ घेतील असे सांगण्यात येते आहे. मंत्रिमंडळात किमान १४ नवे मंत्री असतील. तीन राज्यमंत्र्यांना बढती मिळेल अशी शक्यता आहे. यामध्ये अनुराग ठाकूर, पुरुषोत्तम रुपाला, जी किशन रेड्डी यांचा समावेश आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी काही नेत्यांसोबत बैठक घेतली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link