पटना: यास चक्रीवादळाने २७ आणि २८ मे रोजी बिहारमध्ये मोठे नुकसान केले. जोरदार वाऱ्यासह भरपूर पाऊस झाला होता. या वादळात सात जणांना जीव गमवावा लागला. तर अनेक ठिकाणी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. बिहारच्या कृषी विभागाने चक्रीवादळाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे मूल्यांकन सुरू केले आहे. यावेळी ऊस आणि भाजीपाला पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, यापुर्वी नैसर्गिक आपत्तीमध्ये ऊस पिकाच्या नुकसानीची सरकारकडून भरपाई दिली जात नव्हती.
राज्याचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना मक्का, तांदूळ, मुग, तिळ आणि डाळीच्या पिकांसह आंबे, केळी, भाजीपाला, ऊस अशा सर्व पिकांच्या नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे. यासाठीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या महिना अखेरपर्यंत मूल्यांकन केले जाईल. त्याचा अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिला जाईल.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चक्रीवादळ आणि पावसाने मक्का आणि मुगाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व पिकांच्या नुकसानीचा तपशील देण्यास सांगितले आहे. महसूल विभागाचे अधिकारी पाहणी करतील. त्याची पडताळणी जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल. नंतर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवला जाईल.