रायपूर : छत्तीसगडमध्ये इथेनॉल उत्पादनासाठी पायाभूत सुविधा आहेत. याशिवाय अतिरिक्त भात आहे. मात्र, केंद्र सरकार भातापासून इथेनॉल उत्पादनास राज्याला परवानगी देत नसल्याबद्दल मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी खंत व्यक्त केली. दोन दिवसीय वाणिज्य उत्सवाचे उद्घाटन समारंभावेळी बोलताना मुख्यमंत्री बघेल यांनी छत्तीसगड नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध असल्याचे आणि राज्यात उद्योग, व्यापाराच्या अपार शक्यता असल्याचे सांगितले. छत्तीसगड जगात भाताचे कोठार मानले जाते. जगात कोठेही छत्तीसगड इतकी भाताची विविधता नाही. राज्याकडे जमीन, जंगल आणि पाण्याची समृद्धता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री बघेल म्हणाले, एक काळ असा होता की, आपल्या देशातील नागरिकांना खाण्यासाठी पुरेसे धान्य नव्हते. आपल्याला धान्य आयात करावे लागत होते. हरित क्रांतीनंतर आमच्याकडे अतिरिक्त धान्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा योग्य दर मिळत नाही. आता पिकांसाठी पर्याय असणे महत्त्वाचे बनले आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, भारताकडून पेट्रोलियम उत्पादनांची आयात केली जाते. जर देशात इथेनॉल आणि पेट्रोलियम उत्पादनांची निर्मिती केली गेली तर आपण खूप पैशाची बचत करू शकतो. आपण भात, ऊस आणि मक्क्यापासूनही इथेनॉल बनवू शकतो. आम्ही आधीच ऊस आणि मक्क्यापासून इथेनॉल उत्पादनासाठी प्लांट स्थापन केले आहेत. आमच्याकडे अतिरिक्त तांदूळ आहे. आम्ही केंद्र सरकारला भातापासून इथेनॉल निर्मितीची परवानगी मागितली. मात्र, केंद्र सरकारने आम्हाला परवानगी दिलेली नाही. मी गेली अडीच वर्षे परवानगी मागत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. हे राष्ट्राचे नुकसान नाही का? अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link