नवी दिल्ली : चीनी मंडी
जगातील मोठ्या बाजारपेठांपैकी एक असलेल्या चीनमध्ये साखर निर्यात करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत चीन सरकारला प्रस्तावही देण्यात आला आहे. त्याला चीनकडून चांगला प्रतिसाद असून, ब्राझील आणि थायलंडऐवजी भारताकडून साखर आयात करण्याची चीनचीही तयारी आहे. त्यामुळेच येत्या सहा डिसेंबरला चीनचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर येणार आहे.
चीनही मोठी बाजारपेठ असल्याने भारताच्या साखरेला तेथील बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी भारताचे शिष्टमंडळ नुकतेच चीन दौऱ्यावर जाऊन आले. यात केंद्र सरकारमधील अधिकारी आणि साखर उद्योगातील प्रतिनिधींचा समावेश होता. त्यावेळी भारताशी साखरेचा व्यापार करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याच्याच पुढील टप्पा म्हणून चीनचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर येणार आहे. यात चीनमधील साखर रिफायनरीजच्या १४ अध्यक्षांचासमावेश असणार आहे.
चीनच्या आवाढव्य लोकसंख्येमुळे तेथे मोठी बाजारपेठ आहे. त्या देशाला यावर्षी सुमारे २० ते २४ लाख टन कच्च्या साखरेची गरज आहे. ब्राझील आणि थायलंडमध्ये साखर उत्पादन कमी करून इथेनॉलला प्राधान्य देण्यात आल्याने भारताला चीनच्या बाजारपेठेची गरज भागवण्याची संधी आहे. साखरेचा दर्जा आणि दर याविषयी योग्य चर्चा झाली तर, भारतातून चीनला यंदा २० ते २५ लाख टन साखर निर्यात करता येणे शक्य होणार आहे.