संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू, जिल्ह्यांच्या सीमाही बंद

मुंबई दि. 25: जनतेच्या हितासाठी कर्तव्य भावनेने संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केले.

आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेशी लाईव्ह प्रसारणातून संवाद साधला आणि जाहीर केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जिल्ह्यांच्या सीमाही सील
मुख्यमंत्री म्हणाले की देशांतर्गत विमान वाहतूक थांबवण्यासाठी आपण प्रधानमंत्र्यांना विनंती पत्र पाठवले आहे. आणखी एक पाऊल आज उचलण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतर राज्यांशी सीमा आपण बंद केल्या आहेतच. आता जिल्ह्याच्या सीमाही आपण बंद करत आहोत. जिथे विषाणुचा अजुन प्रादुर्भाव झालेला नाही तिथे विषाणु पोहोचू नये हा त्यामागचा उद्देश आहे.

अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
ही वेळ मौजमजा करण्याची नाही तर स्वयशिस्तीने वागण्याची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, ही बंधने काही काळासाठी आहेत. जीवनावश्यक वस्तु, औषधे, औषधे निर्माण करणारे कारखाने, दुध, बेकरी, कृषी उद्योगाशी सम्बधित दुकाने, पशुखाद्याची दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खाद्यांची दुकाने, आणि दवाखाने सुरुच राहणार आहेत.

गर्दी नाही म्हणजे नाहीच
गर्दी करायची नाही म्हणजे नाहीच याचा पुनरुच्चार करतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, अत्यावश्यक सेवेमध्ये खाजगी वाहने रस्त्यांवर उतरतील. टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन व्यक्ती तसेच रिक्षांमध्ये चालक अधिक एक व्यक्ती अशी परवानगी तेही फक्त अत्यावश्यक सेवेसाठी देण्यात येईल.

संकट आहे पण भविष्यात ते आटोक्यात ठेवायचे असेल तर नियम पाळावेच लागतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आरोग्य व्यवस्थेचा आढावा
आज संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य व्यवस्थेला सज्ज राहण्याच्य सुचना देण्यात आल्या आहेत अंगणवाडी सेविका, आशा, होमगार्ड यांना प्रशिक्षण देऊन यांची मदत घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

माध्यमांना धन्यवाद
घाबरून जाण्याची नसली तरी काळजी घेण्याची वेळ आहे. सरकार जनजागृती करत आहे. अनेक माध्यमे ही काय करावे आणि काय करु नये याची माहिती देऊन सहकार्य करत आहेत. याचे कौतूक करून मुख्यमंत्र्यांनी यासाठी अधिकृत सुत्राद्वारे येणाऱ्या माहितीचाच उपयोग या कामी केला जावा अशी अपेक्षाही व्यक्त केली

होम क्वारंटाईन लोकांनी काळजी घ्यावी
परदेशातून आलेल्या आणि ज्यांना होम क्वारंटाईन केले आहे अशा लोकांनी १५ दिवस समाजाच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी स्वत:ला वेगळे ठेवावे, बाहेर फिरु नये असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सायरन वाजला आहे, पुढचे काही दिवस महत्वाचे आहेत त्यामुळे सर्वांनी खुप काळजी घेण्याची गरज आहे, आतापर्यत सर्वांनी सहकार्य केले आहे. भविष्यात हे सहकार्य कायम ठेऊन आपण सर्व मिळून त्यावर मात करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here