नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या वाढीचा वेग मंदावत चालला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट दिसून आली आहे. मात्र कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ४,००० वर कायम आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे नवे २,८१,३८६ रुग्ण आढळले. तर एका दिवसात ४१०६ जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण संक्रमितांची संख्या २,४९,६५,४६३ झाली आहे. तर आतापर्यंत २,७४,३९० जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात सध्या कोरोनाचे ३५,१६,९९७ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये दिलाशाची बाब अशी की, २,११,७४,०७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण मोहीमही गतीने सुरू आहे. आतापर्यंत १८,२९,२६,४६० जणांना डोस देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्यांच्या आणि बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णसंख्येचा दर घटून १४.०७ टक्के झाला असून मृत्यूदर १.०९ टक्क्यांवर आहे.