नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मंगळवारी हर घर दस्तक हे महाअभियान सुरू केले आहे. ज्या ठिकाणी लसीकरणाची गती संथ आहे, अशा ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत घरोघरी जाऊन लसीकरणाबाबतची जागृती केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरु परतल्यानंतर राज्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत.
देशातील १३ राज्यांतील ४८ जिल्ह्यांत लसीकरणाचा पहिला डोस ५० टक्के लोकांनीही घेतलेला नाही. याबाबत पंतप्रधान ३ नोव्हेंबर रोजी आढावा घेतील. अशा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधान चर्चा करतील. यावेळी संबंधीत राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या उत्तर पश्चिम जिल्ह्यात ४८.२ टक्के, हरियाणातील नूहमध्ये २३.५ टक्के, बिहारमधील अररियामध्ये ४९.६ टक्के तर छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये ४७.५ टक्के लसीकरण झाले आहे. झारखंडमधील नऊ जिल्ह्यांतही लसीकरणाचा वेग ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशात आतापर्यंत १०६.८५ कोटी लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.