कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम बुधवारपासून (1 नोव्हेंबर) सुरू होत आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाणी चंटाईमुळे पिके वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा ऊसतोडीकडे लागल्या आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे हंगाम दबकतच सुरू होणार हे निश्चित आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत स्वाभिमानी संघटनेचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे या तालुक्यातील साखर कारखान्यांसमोर हंगाम सुरु करण्याच्या अडचणी आहेत. उर्वरित तालुक्यातील कारखान्यांचा हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे. यंदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आक्रमक आहेत. मागील हंगामातील ४०० रुपयांच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. याशिवाय सात नोव्हेंबर रोजी परिषदेत ऊस दराची मागणी जाहीर केली जाईल.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 6 कारखान्यांनी प्रति टन 3100 रुपये दर जाहीर केला आहे. मात्र संघटनेने तो अमान्य करत आंदोलन सुरू केले आहे. संघटनांच्या आंदोलनाला शेतकऱ्यांचेही पाठबळ आहे. मात्र, गेल्या दीड, दोन महिन्यात पाऊस अजिबात झाला नसल्याने सप्टेंबर महिन्यापासूनच उसाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.