मानोरी : येवला तालुक्यात लष्करी अळीने मक्याच्या चा-याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्याने ऊसाच्या बांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या तालुक्यात यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावली होती, पण लष्करी किडीमुळे चाऱ्याचे नुकसान झाले आहे.
येवला तालुक्यातील मुखेड, सत्यगाव, दत्तवाडी, नेऊरगाव, भिंगारे, मानोरी बुद्रुक परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन शेतकरी वर्गाने घेतले असून, मुबलक पाण्यामुळे उसाचा दर्जादेखील चांगल्या प्रमाणात सुधारला असून, सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने या ऊसाच्या बांड्यांना जनावरांना हिरवा चारा म्हणून शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
मानोरी, खडकीमाळ, देशमाने, भिंगारे, सत्यगाव, वाकद, नेऊरगाव, शिरवाडे आदी गावांतील शेतकरी वर्ग आपल्या गायींना ऊसाच्या हिरव्या बांड्या घेण्यासाठी येत असतात. ऊसतोड कामगार दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत ऊस तोडून उसाच्या ट्रक भरून दिल्यानंतर उसाच्या बांड्या विकण्यासाठी गावोगावी फिरत असतात. ऊसाच्या बांड्यांना सध्या शंभर रुपये शेकड्याप्रमाणे दर मिळत आहे.
ऊसाच्या हिरव्या बांड्यांमुळे दुधाला अच्छे दिन आले आहेत. त्यात ढेपीचेदेखील दर कमी झाले असल्याने सध्या दुधाला सरासरी ३४ रुपये प्रतिलिटर इतका उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे मुखेड येथे हिरव्यागार बांड्या घेण्यासाठी दररोज शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.