थकीत बिलांच्या मागणीसाठी रयत संघटनेचे ‘किसन वीर’ कारखान्यासमोर आंदोलन

सातारा : किसनवीर सहकारी साखर कारखान्याने थकीत ५४ कोटी रुपयांची ऊस बिले द्यावीत, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेने भुईंज कारखाना कार्यस्थळावर ठिय्या आंदोलन केले. कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामात तोडलेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. उस बिलाची थकीत रक्कम तत्काळ द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

किसनवीर सहकारी साखर कारखान्याने दोन वर्षे उलटून गेली तरी उस उत्पादक शेतकऱ्यांना बिले दिलेली नाहीत. केंद्र सरकारच्या नियमानुसार ऊस तोडणीनंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, अद्याप थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कारखाना व्यवस्थापनाने थकीत एफआरपी व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने केली. आंदोलनात रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोनू उर्फ प्रकाश साबळे, अनिल बाबर, अरुण कदम, विकास मोहिते, प्रमोद जाधव, राहूल पवार, अमोल शिंगटे, गिरीष आवळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here