सुवा : फिजी प्रतिस्पर्धा आणि ग्राहक आयोगाकडून एक्स मिल साखरेचा दर ९० सेंट प्रती किलो वाढविण्यास मंजुरी देण्याच्या निर्णयाचा नॅशनल फेडरेशन पार्टी (एनएफपी) आणि फिजी लेबर पार्टीने (एफएलपी) तीव्र निषेध केला आहे. दुसरीकडे फिजी साखर महामंडळ आणि ऊस उत्पादक परिषदेने या घोषणेचे स्वागत केले आहे. एनएफपीचे नेते प्रा. बिमान प्रसाद यांनी सांगितले की, दिवाळखोरीत पोहोचलेल्या फिजी साखर महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारच्या सहमतीने साखरेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रती किलो ९० सेंट अथवा ६४ टक्क्यांहून अधिकची दरवाढ सरकारकडून लोकांप्रती सहानुभूती नसल्याचे उदाहरण आहे, असा आरोप प्रसाद यांनी केला. तर एफएलपीचे नेते महेंद्र चौधरी म्हणाले, एफसीसीसी द्वारे दरवाढीच्या समर्थानासाठी देण्यात आलेल्या कारणांपैकी कोणतेही कारण ६४ टक्के दरवाढीसाठी योग्य नाही. ही वाढ निश्चितपणे हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांच्या नेहमीच्या वापरातून साखरेला काढून टाकेल असा दावा त्यांनी केला.
हा निर्मय केवळ उद्योगाला फायदेशीर होणार नाही तर दीर्घ कालावधीसाठी अधिक टिकाऊ बनवेल असा दावा एफएससीचे सीईओ भान प्रताप सिंह यांनी सांगितले. ऊस शेतीला अधिक आकर्षक बनविण्यासाठी या निर्णयाचा उपयोग होईल. यातून दीर्घकालीन विकासाला चालना मिळेल. शेतकऱ्यांसाठी ही खूप चांगली बाब आहे. ऊस उत्पादक परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे.