“ऊस बिलाचे पैसे दिल नाही तर, गजाआड व्हा”

बस्ती (उत्तर प्रदेश) : ऊस बिल थकबाकीचा मुद्दा उत्तर प्रदेशात केवळ पहिल्या टप्प्यातच महत्त्वाचा आहे, असे सांगितले जात असताना चार टप्प्यातील मतदान झाल्यानंतरही ऊस बिल थकबाकीचा विषय निवडणुकीत चर्चेत आला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभेत हा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे.

गाळप हंगामातील शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही तर, साखर कारखानदारांना गजाआड जावे लागेल, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साखर कारखाना कंपन्यांना दिला आहे. उत्तर प्रदेशात एका निवडणूक प्रचार सभेतमध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे. महादेवा विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार हरीश द्विवेदी यांच्यासाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

बसप आणि समाजवादी पक्षाची सत्ता असताना ऊस उत्पादकांचे पैसे मोठ्या प्रमाणावर थकीत राहिले होते, असा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘बसप सरकारने २१ साखर कारखाने विकले होते. त्यात खूप मोठा गैरव्यवहार झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर दोन वर्षांत मागील थकबाकीसह शेतकऱ्यांचे ६५ हजार कोटी रुपये देण्यात आले.’

ग्रामीण भागातील जाहीर सभा असल्यामुळे योगा आदित्यनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांच्या योजनांचा पाढाच यावेळी वाचला. त्याचवेळी समाजवादी पक्ष आणि बसपने शेतकऱ्यांचे कसे नुकसान केले आहे, हे समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

योगी आदित्यनाथ म्हणाले, समाजवादी पक्ष आणि बसपने दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेसच्या काळात कोठेही होणारे बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ले कमी झाले आहेत. लष्कराने मनोबल घटले होते. मोदींच्या नेतृत्वाखाली पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here