महाराष्ट्रातील शेतकरी आता आपली पिके वाचविण्यासाठी किटकनाशकांचा वापर करताना ड्रोनचा वापर करताना दिसत आहेत. अकोला जिल्ह्यातील दानापूर गावात भाजीपाला उत्पादक शेतकरी ड्रोनने औषधे फवारत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी गोपाल येवूळ यांनी आपल्या १० एकर जमिनीत टोमॅटो पिकावर आधुनिक ड्रोनने औषधांची फवारणी केली. तर यातून औषधांचीही खूप बचत होत असल्याचे इतर शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वेळही वाचत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी आता ड्रोनने किटकनाशकांची फवारणी करत आहेत. यासाठी ड्रोन उपयुक्त ठरत आहे.
ड्रोनद्वारे औषध फवारणी केल्यास त्यांची बचत होते, वेळही वाचतो असे शेतकऱ्यांनी सांगितले. दोनापूर आणि इतर ठिकाणीही याचा वापर होताना दिसत आहे. अलिकडे शेतीच्या यांत्रिकीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यातून वेळ, खर्च कमी होतो. पारंपरिक पद्धतीने शेती केली जात असली तरी त्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यात कामगारांचा तुटवडा आहे. त्यामुळे ड्रोनचा वापर अधिक केला जाईल असे दिसते. शेतकरी एकत्र येऊन ड्रोनचा वापर करण्याबाबत उत्सुक दिसत आहेत. दुसरीकडे ड्रोन वापराने शेतमजुरांचे काम धोक्यात आले आहे.