नवी दिल्ली : केंद्र सरकारने मार्च २०२१ पर्यंत मंजूर केलेल्या १२५ लाख टन देशांतर्गत साखर कोटा विक्रीच्या तुलनेत १२९.४८ लाख टन साखर विक्री झाली आहे. इंडियन शुगर मील असोसिएशनने ही माहिती दिली.
गेल्यावर्षी याच कालावधीत १२६ लाख टन साखर विक्री कोट्याच्या तुलनेत १३०.२९ लाख साखर विक्री होणे अपेक्षित होते. म्हणजेच सध्याच्या तुलनेत फक्त ०.८१ लाख टन अधिक जास्त होती. गेल्या वर्षी मार्च २०२० मध्ये देशात लॉकडाउन लागू झाल्याने तसेच रेस्टॉरंट, मॉल, मल्टिप्लेक्स, स्वीटमार्टू, खाद्य पदार्थ दुकाने बंद राहिल्याचा परिणाम साखर विक्रीवर झाला. यावर्षी काही राज्यांत नाइट कर्फ्यु आणि लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे साखर पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेवर कमी परिणाम होईल अशी अपेक्षा इस्माला आहे.