कोल्हापूर : यंदा जुलै महिन्याच्या अखेरीस आलेल्या महापुरामुळे उसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे २५,००० हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाला महापुराचा फटका बसला आहे. प्रत्येक कारखाना कार्यक्षेत्रातील सरासरी १० ते १५ टक्के ऊस बाधित झाला आहे. त्यामुळे साखर उत्पादनात दहा टक्क्यांनी घट येईल अशी शक्यता साखर कारखान्यांच्या शेती विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्राथमिक माहितीनुसार २४,२८२ हेक्टर क्षेत्रावरील ऊसाचे नुकसान झाले आहे.
प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ६३ हजार ९२२ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. मात्र जुलै महिन्याच्या अखेरीस आलेल्या महापुरामुळे उसाचे क्षेत्र बाधीत झाले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५८ हजार हेक्टर क्षेत्राला पुराचा तडाखा बसला. त्यापैकी उसाचे क्षेत्र २४ हजार २८२ हेक्टर इतके आहे. बाधीत पिकाचे प्रमाण सरासरी दहा टक्के आहे. नदीकाठच्या जमिनीला, ऊस पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक एस. एन. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार साखर कारखान्यांनी उसाच्या नुकसानीचा सर्व्हे केला आहे. सरासरी दहा टक्के ऊस खराब झाला आहे. सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नदीकाठचा ऊस खराब झाला आहे. यामध्ये दत्त शिरोळ कारखान्याचे सर्वाधिक २७०० हेक्टर क्षेत्रावरील ऊस पाण्यात बुडाला होता. त्या पाठोपाठ वारणा कारखाना कार्यक्षेत्रातील २६८२ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे अशी माहिती कारखान्याच्या माध्यमातून देण्यात आली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link