मुंबई : महाराष्ट्राचे सरासरी वार्षिक तापमान २०५० पर्यंत २.५ डिग्री सेल्सीयसने वाढण्याची शक्यता असल्याचे अनुमान बारामतीचे प्रा. राहुल तोडमल यांनी काढले आहे. याबाबत प्रतिष्ठीत स्प्रिंगर नेचर जर्नलमथध्ये त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. या शकताच्या अखेरपर्यंत राज्यातील सरासरी मान्सून २१० मिलीमिटरने वाढण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रातील हवामान बदलाचा कृषी क्षेत्रावर गंभीर नकारात्मक परिणाम होईल असे प्रा. तोडमल यांनी सांगितले.
तापमान वाढीचा फटका प्रामुख्याने ऊस, तांदूळ, बाजरी अशा मुख्य पिकांना बसेल असे अभ्यासात दिसून आले आहे. याशिवाय गव्हाच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम होणार आहे.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधील एसएससी कॉलेजमध्ये भूगोलचे सहाय्यक प्राध्यापक असलेल्या रालुल तोडमल यांनी केलेल्या संशोधनात म्हटले आहे की, २०५० पर्यंत राज्याच्या बहुतांश भागाचे सरासरी तापमान ०.५ ते २.५ डिग्री सेल्सियसने वाढलेले असेल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात १ डिग्री तापमानवाढ होईल. आगामी पाच दशकांत ८० टक्के जिल्ह्यांमध्ये वार्षिक सरासरी किमान तापमान ०.१ -१.२ डिग्री सेल्सीयस वाढ होईल. महाराष्ट्रातील पाऊसही अत्यंत विध्वंसक महापुराचे कारण बनू शकेल. भविष्यात तापमानातील वाढीमुळे पारंपरिक पावसावर आधारित पिके तसेच सिंचनावर घेतल्या जाणाऱ्या पिकांची उत्पादकता घटेल. वाढत्या तापमानामुळे विविध पिकांच्या उत्पादनात ४९ टक्क्यांपर्यंतची घट येऊ शकेल, असा निष्कर्ष प्रा. तोडमल यांनी काढला आहे.