जबलपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे इथेनॉल उत्पादनाकडे गुंतवणुकदारांचा कल वाढत आहे. इंधन तयार करण्यासाठी आवश्यक असलेला तांदूळ, ऊस जबलपूरसह परिसरात पुरेसा उपलब्ध आहे. जबलपूरमध्ये तीन युनिट्ससाठी आधीच जमीन वाटप करण्यात आली आहे. चौथे गुंतवणूकदार मणेरी औद्योगिक केंद्रातील जागेत प्लांट स्थापन करतील. याशिवाय सिवनी, बालाघाटमध्येही प्लांट स्थापन होतील. सर्व ठिकाणी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून ३०० हून अधिक लोकांना रोजगार मिळेल.
पत्रिकामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जबलपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात कच्च्या मालाची उपलब्धता असल्याने औद्योगिक क्षेत्र आणि खासगी जमिनींवर युनिट स्थापन केले जातील. त्यासाठी मध्यप्रदेश इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (एमपीआयडीसी) जमीन वाटप केले आहे. उर्वरित प्रक्रियेनंतर प्लांट स्थापन होतील. सध्या पेट्रोल, डिझेलमध्ये मर्यादित प्रमाणात इथेनॉल मिसळले जाते. त्याची रिफिलिंग डेपोतून केली जाते. भविष्यात सर्व वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर सुरू होईल. तसेच शुद्ध रुपात याचा वापर केला जाणार आहे. जिल्ह्यात शहपुरा, मणेरी, उमरिया-डुंगरिया आणि हरगड औद्योगिक क्षेत्रातील ६० एकर जमीन यासाठी वाटप करण्यात आली आहे. प्रत्येक प्लांट १००-१०० केएल क्षमतेचा असेल. चार प्लांटमध्ये ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. या प्लांटमध्ये ऊस आणि तांदळापासून इथेनॉल निर्मिती होईल.