सोलापूर जिल्ह्यात ११ कारखान्यांकडे ७३ कोटींची एफआरपी थकीत

सोलापूर : जिल्ह्यात ऊस गाळपाने गती घेतली असली तरी ऊस बिलांबाबत कारखान्यांकडून चालढकल सुरू असल्याचे दिसते. यंदाच्या हंगामातील पहिल्या पंधरवड्यात ३३ कारखान्यांनी १७ लाख ३७ हजार ९४३ टन उसाचे गाळप केले. कारखान्यांनी त्यापोटी ३८७.७६ कोटी रुपये शेतकऱ्यांना ऊस बिलाच्या स्वरूपात दिले आहेत. मात्र, नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत गाळप झालेल्या उसापोटी ११ कारखान्यांकडे ७३.२ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. आता शेतकरी संघटनासह शेतकऱ्यांनीही ऊस बिलासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी बेसिक रिकव्हरीप्रमाणे १०० टक्के एफआरपी दिली आहे. मात्र, भैरवनाथ शुगरच्या विहाळ, लवंगी व आलेगाव येथील युनिट्स, युटोपियन, धाराशिव (सांगोला) या पाच कारखान्यांनी पहिल्या पंधरवड्यातील एक रुपयाही शेतकऱ्यांना दिलेला नाही. तर संत कुर्मदास कारखान्याने ३९.५८ टक्के, लोकमंगल साखर कारखान्याने ५५.६० टक्के, इंद्रेश्वर शुगरने १४.८० टक्के आणि बबनरावजी शिंदे कारखान्याने २७.४७ टक्के एफआरपी दिली आहे. यंदा ऊस तुटवड्यामुळे कारखाने जादा दर जाहीर करीत आहेत. मात्र, कारखान्यांनी किमान पहिल्या पंधरवड्यातील ऊस बिले द्यायला हवी होती. आम्ही साखर आयुक्तांकडे याबाबत तक्रार करून ही बाब निदर्शनास आणणार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here