ऊस पिकाच्या लागवडीला प्राधान्य द्या : ‘विघ्नहर’चे अध्यक्ष शेरकर यांचे आवाहन

पुणे : कांदा, भाजीपाला, फुले आदींना शाश्वत बाजारभाव मिळत नाही. भविष्यात उसाला प्रतिटन रुपये ३००० पेक्षा कमी बाजारभाव मिळणार नाही. त्यामुळे सर्वांनी ऊस लागवडीकडे वळावे. उसातून शाश्वत उत्पन्न मिळू शकते. शाश्वत हमीभाव असलेल्या ऊस पिकाची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लागवड करावी, असे आवाहन विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी केले. पिंपळगाव जोगा (ता. जुन्नर) येथे कारखान्याच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यास खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट दिली.

अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले की, भविष्यकाळात कारखान्याची गाळप क्षमता ७५०० टन प्रती दिन करणार आहे. भविष्यात पाणीप्रश्नाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे १८० दिवसांऐवजी १२० दिवसांत गाळप पूर्ण केले जाणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेणखताचा वापर वाढवावा. हिरवळीच्या खतांचा वापर करण्याबरोबरच शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांचा वापर, पाणी व किडरोग व्यवस्थापन केल्यास प्रतिएकरी भरघोस ऊस उत्पादन मिळेल. यावेळी कृषीभूषण डॉ. संजिव माने, विघ्नहरचे उपाध्यक्ष अशोक घोलप, जुन्नर बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर खंडागळे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जिल्हा बँकेचे संचालक तुळशिराम भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, मोहित ढमाले, कार्यकारी संचालक भास्कर घुले, अरुण थोरवे, शेतकी अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here