मडगाव/फोंडा : संजीवनी साखर कारखाना आधी बंद करून नंतर पुन्हा सुरू करण्याचे खोटे आश्वासन देऊन सरकारने फसवणूक केल्याचा आरोप ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगे ऊस उत्पादक संघर्ष समितीचे सदस्य प्रशांत देसाई म्हणाले की, राज्य सरकारने गेल्या वर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती टन ३,६०० रुपये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतकऱ्यांनी पिकवलेला ऊस कर्नाटकात पाठवल्याबद्दल आक्षेप घेत त्यांनी संजीवनी मिलमध्ये उसाचे गाळप करण्याची मागणी केली. मात्र, त्यांच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने हजारो टन ऊस वाया गेल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार संजीवनी साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल निराशा व्यक्त करत देसाई यांनी हा साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. कारखान्याच्या भवितव्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नुकतीच केली आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा ६ डिसेंबर रोजी कारखान्याच्या आवारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.