रोहतक : सरकारने शेतकऱ्यांकडून पाचट (Stubble) विकत घेतले तर शेतकरी ते जाळण्याच्या अडचणीतून मुक्त होऊ शकतात असा दावा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केला. शेतकरी ते नाईलाजाने जाळतात. सरकारने याचे किमान मूल्य निश्चित करावे आणि शेतकऱ्यांकडून त्याची खरेदी करावी. त्याचा वापर वीज उत्पादनासारख्या इतर उद्देशांसाठी निश्चित करता येईल असा दावाही हुड्डा यांनी केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय राजधानीतील वायू प्रदूषणाबाबत वारंवार पंजाब आणि हरियाणातील पाचट जाळण्यास जबाबदार ठरवले आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, दिल्लीच्या प्रदूषणाचा स्तर सध्याही उच्च स्तरावर आहे. आतापर्यंत ४५,००० ठिकाणी पाचट जाळण्यात आले आहे. त्याचा परिणाम दिल्लीच्या प्रदूषणावर झाला आहे. राष्ट्रीय राजधानीतील हवेची गुणवत्ता प्रचंड खराब झाल्याचा निष्कर्ष सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) या संस्थेने नुकताच जाहीर केला आहे.