नवी दिल्ली: देशात लसींचा तुटवडा असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील लसीकरणाची मोहीम संथ झाली आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी सांगितले की, ४५ वर्षावरील नागरिक आणि १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण सध्या सुरू आहे. मात्र, मागणीच्या प्रमाणात लस उपलब्ध नाही. त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचे लसीकरण रखडण्याची शक्यता आहे. १८ वर्षावरील लोकांसाठी उपलब्ध झालेली लस ४५ वर्षावरील लोकांना दुसरा डोस म्हणून देण्यासाठी वापरली जाईल.
मंत्री टोपे म्हणाले, १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र, केंद्र सरकारने ४५ वर्षावरील लोकांच्या लसीची जबाबदारी घेतली. राज्यात कोवॅक्सीनचे फक्त ३५,००० डोस उपलब्ध आहेत. आता अनेकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. अशा लोकांची संख्या ५ लाख आहे. मग जास्त लोकांना डोस कसे दिले जाऊ शकतात असा प्रश्न आहे.
त्यामुळे १८ ते ४४ या वयोगटासाठीचे डोस ४५ वर्षावरील लोकांसाठी वापरणे गरजेचे बनले आहे. तरच ४५ वयोगटावरील लोकांना लस देण्याचे अभियान पूर्ण होऊ शकते. राज्य सरकारने कोव्हॅक्सिनचे पावणेतीन लाख डोस विकत घेतले आहेत. केंद्र सरकारकडील ३५ हजार डोसनंतर सव्वातीन लाख डोस उपलब्ध आहेत. हे सर्व कोव्हॅक्सिनचे डोस ४५ वर्षावरील नागरिकांना दिले जातील.
को
१८ ते ४४ वयोगटासाठीच्या व्हॅक्सिनचे डोसेस ४५ वर्षावरील वयोगटासाठी वापरण्याचे निर्देश लसीकरण केंद्रांना दिले आहेत. कोविशिल्डचीही टंचाई असल्याचे मंत्री टोपे म्हणाले. कोविशिल्डचे १६ लाख डोस आम्हाला केंद्र सरकार देणार होते. त्याचा वापर आम्ही ४५ वर्षावरील लोकांना करणार होतो. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी १५-२० मिनिटे फोनवरून चर्चा झाली. मात्र, त्यांच्याकडेही लस उपलब्ध नाही असे टोपे यांनी सांगितले.
अशा स्थितीत १८ ते ४४ वयागटासाठी खरेदी केलेली लस ४५ वर्षावरील लोकांसाठी वापरली जाईल. त्यासाठी टास्टफोर्सशी चर्चा केली जाईल. लसीकरणाची गती संथ केली जाईल. राज्य सरकारकडे लस खरेदीसाठी पैसे आहेत. मात्र लस उपलब्ध नाही असे टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.