नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये भीषण ऊन आहे. आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा पारा ४० डिग्रीवर पोहोचला आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात २० आणि २१ मे रोजी उष्णतेच्या लाटेचे अनुमान आहे. झारखंडमध्ये आजही उन्हाचा तडाखा जाणवेल. केरळमध्ये तापमान वाढणार असून गोव्यात पुढील पाच दिवसांत उन्हाचा पारा वाढणार आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, पंजाब, हरियाणा आणि चंदीगढमध्ये आज धुळीचे वादळ सुरू राहील.
इंडिया डॉट कॉमच्या म्हणण्यानुसार, हरियाणा आणि पंजाबमध्ये बुधवारी वातावरण तप्त होते दोन्ही राज्यांच्या बहुसंख्य भागात तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक झाले आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, हरियाणातील हिस्सारमध्ये सर्वाधिक तापमान आहे. कमाल तापमान ४२.५ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तामीळनाडूत उष्णतेची लाट आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारपर्यंत तापमान अधिक राहिल. तर हिमाचल प्रदेशात वादळाचा इशारा असून हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होईल असे संकेत आहेत.