मुंबई ः भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी मुंबईसह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पालघर, ठाणे, रायगडमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. हवामान विभागाने मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
मनीकंट्रोल डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमडीने सांगितले की, मुंबईत सोमवारी, २० जून रोजी ढगाळ हवामान राहील. सद्यस्थितीत दक्षिण-पश्चिम मान्सून महाराष्ट्राच्या उत्तर विभागात पोहोचलेला नाही. मात्र, तो या आठवड्यात पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्टद्वारे मुंबई आणि उपनगरात मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यासोबतच ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात पुढील दोन ते तीन दिवसांत १३० मिमीपर्यंत पाऊस कोसळू शकतो असे हवामान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई आणि उपनगरात गेल्या आठवड्याच्या अखेरीस पाऊस झाला आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात गेले आठवडाभर ढगाळ हवामान आहे. मात्र, फक्त काही जिल्ह्यांतच थोडा पाऊस झाला आहे. दिल्लीतही पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीच्या सुत्रांनी सांगितले.