मुंबई : मुंबई शहरातील अनेक विभागांत आजही जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे, हवामान विभागाने अलर्ट जारी करताना म्हटले आहे की, ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार वारे वाहतील. सुमारे ४०-५० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही भाग जलमय झाला आहे.
इंडिया डॉट कॉमवरील वृत्तानुसार, हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्रातील इतर शहरांसाठीही पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. यासोबत समुद्राची वाढती पातळी पाहता दहा वाजता सर्व बीच बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी झालेल्या पावसाने मुंबईच्या लोकल ट्रेनसेवेला फटका बसला. तर बीएमसीने नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे. याबाबत प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले की, भारतीय हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या ऑरेंज आणि रेड अलर्टच्या काळात सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेतच बीच खुले राहतील. आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.