परिस्थिती सुधारली नाही तर महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. कोरोनाचा फैलाव गतीने होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. जर आगामी काळात कोरोनाची स्थिती आणखी बिघडली तर लॉकडाउन सुरू केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. कोरोनामुळे राज्यातील लोक धास्तावले आहेत असेही ते म्हणाले.
मार्च महिन्यानंतर राज्यातील कोरोनाचा फैलाव गंभीर झाला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

आगामी काळात दररोज २.५ लाख लोकांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याचे उद्दीष्ट आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, काही दिवस कडक नियम लागू केले जातील. त्याबाबतची माहिती आगामी काही काळात दिली जाईल. जर स्थिती हाताबाहेर गेली तर वेगळा विचार करावा लागेल.

एक ते दोन दिवसांत पुन्हा मी संवाद साधणार आहे. नोकरी पुन्हा मिळू शकते. मात्र जीव गमावला तर ते परवडणारे नाही. लॉकडाउनऐवजी दुसरे पर्याय शोधले पाहिजेत. आगामी काही दिवसात हॉस्पिटल रुग्णांनी फुल्ल होतील. मला सर्व राजकीय नेत्यांना आवाहन करायचे आहे की, यात राजकारण करू नका.

व्हॅक्सिन घेतल्यानंतर लोक मास्क घालत नाहीत
ठाकरे म्हणाले, आतापर्यंत आम्ही ६५ लाख लोकांना कोविड १९ लस दिली आहे. लसीकरण केल्यानंतरही काही लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. कारण ते मास्क घालणे टाळतात. मी इथे कोणालाही घाबरवण्यासाठी आलेलो नाही, उलट या संकटावरील उपायाबाबत चर्चा करीत आहे. आधी सर्व काही बंद होते. पण, नंतर पुन्हा लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने सुरू झाली. आपण तज्ज्ञांशी चर्चा करून काही काळ आणखी संयम बाळगायला हवा असे मी सांगत होतो. तसे घडले नाही. सद्यस्थितीत महाराष्ट्रात मुंबई, नाशिक, पुणे, ठाणे आणि नागपूर हे सर्वाधिक कोरोना प्रभावित जिल्हे आहेत.

महाराष्ट्रात दररोज ८००० रुग्ण
ते म्हणाले, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, जिथे तातडीने हॉस्पिटलची उभारणी झाली. मुंबईत जानेवारीच्या अखेरीस आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला दररोज ३००-४०० रुग्ण आढळत होते. आज आठ हजार रुग्ण आहेत.

पुण्यात नाइट कर्फ्यूची घोषणा
शुक्रवारी महाराष्ट्रातील पुण्यामध्ये नाइट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली. शनिवारी ३ एप्रिलपासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुढच्या शुक्रवारी स्थितीचा आढावा घेण्यात येईल. सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाइट कर्फ्यू असेल. देशातील अनेक शहरांमध्ये लागू केलेल्या नाइट कर्फ्यूमध्ये हा सर्वाधिक कालावधीचा नाइट कर्फ्यू आहे. पुणे विभागाचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, आगामी सात दिवस बार, हॉटेल, रेस्टराँ बंद राहतील. याशिवाय, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार याशिवाय इतर सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असेल. लग्नासाठीही ५० जण तर अंत्यसंस्कारासाठी २० जण सहभागी असतील.
दरम्यान, जिल्ह्यात शु्क्रवारी कोविड १९चे नवे ४१०८ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण संक्रमितांची संख्या २,३३,७७६ झाली आहे. आणखी ६० जणांच्या मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या ५२१८ झाली आहे. नागपूर शहरात कोरोनामुळे ३३१० जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात ३२१४ रुग्ण बरे झाले. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १,८७,७५१ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here