तिरुपती : चित्तूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात सातत्याने सुरू राहिलेला पाऊस आणि त्यानंतर आलेला पूर यामुळे पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्याचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आल्याची माहिती चित्तूर जिल्हा कृषी विभागाने दिली. अहवालानुसार चित्तूरमध्ये ऊसासह इतर ११,३६८ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. १८ ते २० नोव्हेंबरपर्यंत झालेल्या जोरदार पावसाचा फटका सर्व ६६ मंडल विभागांत बसला. याचा परिणाम एकूण
११,३६८ हेक्टरमधील विविध प्रकारच्या पिकांवर झाला. त्यातून ३६,२९५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून एकूण १७.२९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
अहवालानुसार, भात, भुईमुग, ऊस, लाल चणा, मक्का अशा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ३१,८०७ शेतकऱ्यांचे ९,७९५ हेक्टरमध्ये भात पिक होते. तर ११८७ शेतकऱ्यांचे ५०१ हेक्टरमध्ये भुईमुग पिक होते. ७० हेक्टरमधील १९६ शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. ६६ शेतकऱ्यांचे २१ हेक्टरमध्ये लाल चणा आणि ४०२ शेतकऱ्यांचा १६६ हेक्टरमधील मक्का खराब झाला आहे.