नाशिक : जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. निफाड तालुक्यात उसाच्या कमतरतेमुळे उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. काही साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन दोन हजार ५०० रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे. उसाच्या उत्पादांत होणाऱ्या घटीचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर होण्याची शक्यता आहे.निफाड तालुक्यात सरासरी ९ हजार एकरावर सुरू उसाचे क्षेत्र असते. मात्र पावसाच्या कमतरतेमुळे उसाच्या क्षेत्रात व उत्पादनात कमालीची घट झाली आहे.
रानवड साखर कारखान्याने २ हजार ५०० रूपये टन भाव जाहीर केला. तर कादवा, द्वारकाधीश आणि नगर जिल्ह्यातील मधील अगस्ती (अकोले), संजीवनी (कोपरगाव), संगमनेर यांनीही जवळपास याच दरम्यान दर जाहीर केले आहे. गळीत हंगाम यंदा डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ऊस न मिळाल्यास साखर गाळप बरोबरच उपपदार्थ प्रकल्प कसे चालवायचे हे ही मोठे आव्हान कारखान्यापुढे असेल. ऊस उत्पादक व कारखान्यांना आर्थिक जळ बसण्याची भीती आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव वधारत आहे. परंतु अपेक्षित साखर उत्पादन होणार नसल्याने त्याचा फायदा होणार नाही.