नवी दिल्ली : देशात कोरोना संक्रमणाच्या नव्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. दोन दिवस तर संक्रमितांची संख्या १० हजारांपेक्षा कमी आहे. मात्र, जगभरातील अनेक देशांत कोरोनाचा प्रकोप कायम आहे. दुसरीके भारताची स्थिती अधिक चांगली होत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात नव्याने साडेसात हजार संक्रमित आढळले आहेत. गेल्या ५४३ दिवसांत ही सर्वात कमी संख्या आहे. दुसरीकडे २३६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. याशिवाय, देशभरात १२ हजारहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात कोरोनाचे ७५७९ नवे रुग्ण आढळले आणि २३६ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय गेल्या २४ तासात १२,२०२ जण बरे झाले आहेत. यासोबतच सक्रीय रुग्णसंख्या १,१२,५८४ झाली आहे. ही गेल्या ५३६ दिवसांत सर्वात कमी आहे. एकूण रुग्णापैकी साडेतीन हजार रुग्ण केरळमध्ये आहेत. गेल्या २४ तासात केरळमध्ये ३६९८ नवे संक्रमीत आढळले. तर ७५ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय येथे ७५१५ जण बरे झाले.
देशभरात सक्रिय रुग्णसंख्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. सध्या ही संख्या ०.३३ टक्के आहे. मार्च २०२० नंतर ही संख्या सर्वात कमी असल्याचे आरोग्य खात्याच्या सुत्रांनी सांगितले.