नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जानेवारी या दरम्यान भारताच्या कृषी निर्यातीत ६.०४ टक्क्यांची वाढ होऊन ती ४३.३७ बिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही निर्यात ४०.९० अब्ज डॉलर होती. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताची कृषी निर्यात ५०.२१ बिलियन अमेरिकन डॉलरच्या उच्च स्तरावर पोहोचली होती. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी बुधवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले की, २०२३-२४ साठी आतापर्यंत कोमतेही निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले नाही. कृषी निर्यातीमधील वाढ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा करीत आहे. शेतकऱ्यांना निर्यातीचा लाभ होत आहे. यासाठी सरकारने शेतकरी उत्पादक संघटना, कंपन्या (एफपीओ-एफपीसी) आणि सहकारी समित्यांना निर्यातदारांशी थेट चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक किसान कनेक्ट पोर्टल लाँच केले आहे. केंद्रीय एजन्सी कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ उत्पादनांच्या निर्यातीबाबतच्या प्रोत्साहन उपक्रमांशी संलग्न आहे.
मंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितले की, एपीडा विविध आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावे आणि प्रदर्शनांमध्ये सहभाग घेणे, आभासी व्यापारी मेळाव्यांचे आयोजन, खरेदीदार-विक्रेता बैठकांचे आयोजन करणे आणि जीआय उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातील भारतीय योजनांसह सहयोग करणे असे प्रयत्न करीत आहे. एपीडीने निर्यात क्षमता असलेल्या आणि नव्या ठिकाणांसाठी, नव्या उत्पादनांसाठी परीक्षण शिपमेंट सुविधाही दिली आहे.