नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचे कोरोना महामारीमुळे झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी एक दशकापेक्षा अधिक काळ लागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) एका अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था कोविडमुळे झालेले नुकसान आर्थिक वर्ष २०३५ पर्यंत भरुन काढेल. यासोबतच या अहवालात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षात भारताने जवळपास ५० लाख कोटी रुपयांचे आऊटपूट गमावले आहे. आरबीआयच्या अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था कोरोना काळातील नुकसानीची भरपाई २०३४-३५ पर्यंत भरुन काढेल. २०२०-२१ मध्ये अर्थव्यवस्थेला १९.१ लाख कोटी रुपयांचे, २०२१-२२ मध्ये १७.१ लाख कोटी रुपये, आणि २०२२-२३ मध्ये १६.४ लाख कोटी रुपयांचे आऊटपूट नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याची भरपाई करण्यासाठी १०-१२ वर्षे लागतील.
याबाबत टीव्ही ९ हिंदी डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, देशात मध्यम अवधीचा आर्थिक दर ६.५-८.५ टक्के मिळविण्यासाठी संरचनात्मक सुधारणा तथा किंमतीमध्ये स्थिरतेची गरज आहे. आर्थिक वर्ष २०२१-११ मध्ये मुद्रा तसेच आर्थिक अहवालात अनेक सुधारणांची शिफारस करण्यात आली आहे. शिक्षण, आरोग्य यावरील सार्वजनिक खर्च वाढवून स्कील इंडिया मिशनच्या माध्यमातून श्रमाची गुणवत्ता सुधारावी, इनोव्हेशन, तंत्रज्ञान, संशोधन यावर वाढ करावी, स्टार्टअप, युनिकॉर्नसाठी अनुकूल वातावरण तयार करावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत.