कर्नाटक : शेतकऱ्यांना ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची राजू शेट्टी यांची मागणी

कोल्हापूर / विजापूर : कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती टन ४०० रुपये दुसरा हप्ता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कर्नाटकचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांच्याकडे केली. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर आहे. त्यामुळे जादा दर देण्याची मागणी त्यांनी केली.

विजापूर येथे शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची भेट घेतली. मंत्री पाटील यांनी ऊस उत्पादक व वाहतूकदारांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावेळी राजू शेट्टी यांनी कर्नाटक राज्यातील वजनकाटे ऑनलाइन करावेत, महाराष्ट्र सरकारप्रमाणे कर्नाटकनेही फसवणूक केलेल्या ऊसतोडणी मुकादमांवर कारवाई करण्याची मागणी केली.

राजू शेट्टी म्हणाले की, गेल्यावर्षी सरकारने इथेनॉल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी एफआरपीपेक्षा प्रती टन १५० रुपये व इतर कारखान्यांनी प्रती टन १०० रुपये जादा दर देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करावी. साखर कारखान्यांमध्ये काटामारीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वजनकाटे ऑनलाइन करावेत अशी मागणी त्यांनी केली.

मंत्री शिवांनद पाटील यांनी कर्नाटक सरकारने गेल्यावर्षीच कारखान्यांना एफआरपीपेक्षा जादा दर देण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच न्यायालयातही सरकारच्या बाजूने निकाल लागेल. त्याचीही अंमलबजावणी करण्यास कारखानदारांना भाग पाडू असे सांगितले. सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, संदीप राजोबा, तात्या बसण्णावर, गणेश इळेगेर, बाबूराव पाटील आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here