लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखान्यांकडून गेल्या हंगामातील ऊस बिले अद्याप देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे यंदा दिवाळीत काहीच उत्साह नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळी एक दिवसावर आली तरी अद्याप शेतकऱ्यांना १०० टक्के ऊस बिले अदा झालेली नाहीत. पैशांच्या तंगीशी झुंजत असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमध्ये जवळपास ४५ लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. राज्यातील ११९ साखर कारखान्यांना ते ऊस विक्री करतात. यापैकी ५० कारखान्यांनी अद्याप ऊस थकबाकी दिलेली नाही. तर नवा गळीत हंगाम आता सुरू झाला आहे. आपल्या गरजा भागविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस गुऱ्हाळ आणि क्रशरला विक्री करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्याचा दर राज्य समर्थन मुल्यापेक्षा कमी आहे. नवा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी अद्याप थकबाकी शिल्लक आहे. सरकारने डिफॉल्टर साखर कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भारतीय किसान संघाचे मंडल अध्यक्ष दिगंबर सिंह यांनी सांगितले की, आमच्या संघटनेने हा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार आहे.